मिरज सिव्हिल रुग्णालयातील ३ दिवसाच्या शासकीय बाळाच्या अपहरणप्रकरणी चौकशीचा बोगस अहवाल रद्द करून, नव्याने उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्याची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या रजेच्या कालावधीत प्रभारी अधिष्ठाता डॉ. अहंकारे यांनी या घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत केली होती. मात्र या समितीने तयार केलेला अहवाल चुकीचा आणि अपूर्ण असल्याचे आरोप डॉ. कांबळे यांनी केले. त्यामुळे या अहवालाला अंमलात न आणता, उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची संयुक्त चौकशी समिती गठीत करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
अपहरणाच्या दिवशी संबंधित वार्डात ६० ते ६५ रुग्ण दाखल होते आणि प्रत्येकी दोन ते तीन नातेवाईकांसह एकूण २०० ते २५० जणांची वर्दळ होती. या वार्डात पाच विभागांचे नर्सेस, डॉक्टर्स, कर्मचारी कार्यरत होते. परंतु रुग्णाच्या नातेवाईकांना आत किंवा बाहेर सोडण्याची जबाबदारी महिला व पुरुष सुरक्षा रक्षकांवर होती. तरीही अपहरण झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी स्पष्ट दिसून येतात.
प्रभारी अधिष्ठाता डॉ. अहंकारे यांनी समिती गठीत करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले होते का, याचे कोणतेही अधिकृत कागदोपत्री पुरावे उपलब्ध नाहीत. तयार अहवालात एका परिसेविका व पाच नर्सेस यांना दोषी धरले आहे. मात्र त्यांच्या जबाबांची पूर्ण चौकशी व वैधता तपासली गेली नसल्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची फेरचौकशी करून योग्य न्याय व्हावा, अशी मागणी डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे.
0 Comments