भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज सांगलीत ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजवलेल्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या शहीद सैनिक व नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी भव्य *‘तिरंगा रॅली’*चे आयोजन करण्यात आले. मार्केट यार्ड येथील हुतात्मा स्मारकापासून म. गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत देशभक्तीच्या घोषणा, तिरंग्यांचा उत्साह व देशसेवेचा अभिमान दिसून आला.
रॅलीपूर्वी पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेत बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमित सिंह या महिला अधिकाऱ्यांच्या शौर्याचे यावेळी विशेष गौरव करण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही फक्त एक सैनिकी मोहिम नव्हती, तर ती भारतीय जवानांच्या असामान्य शौर्य, निष्ठा आणि समर्पणाची साक्ष देणारी मोहीम ठरली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या सैनिकांनी दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत भारताचा गौरव उंचावला आहे. ही तिरंगा यात्रा शहीद सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आणि देशभक्तीचा जागर करणारी ठरली.
या रॅलीत खासदार विशालदादा पाटील, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, मा. जितेश कदम यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments