सांगली जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोयना धरणातून सुरू असलेल्या 31,746 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
सांगली शहरातील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फूट ४ इंचांवर पोहोचली असून, केवळ २४ तासांत तब्बल ६ फूटाने पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
या वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीवरील बहे, बोरगाव, नागठाणे, डिग्रज, सांगलीवाडी आणि म्हैशाळ येथील ६ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे शेतजमीन, रस्ते आणि काही ठिकाणी वस्तीवरही पाण्याचा ताण जाणवत आहे.
प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल यंत्रणा, NDRF, पोलिस आणि ग्राम प्रशासन यांना अलर्टवर ठेवले आहे. काही भागात बचाव कार्यासाठी होमगार्ड व स्थानिक स्वयंसेवकांची मदत घेण्यात येत आहे.
कोयना धरण आणि वारणा धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणांमधील पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. परिणामी धरण प्रशासनाने विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला. यामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात सतत वाढ होत आहे.
प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, लोकांनी नदीजवळ जाणे टाळावे, नदीकिनाऱ्यावर पाळीव प्राणी किंवा लहान मुलांना नेऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
पुराच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर काही भागांतील वीजपुरवठाही तात्पुरता बंद करण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणांना तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.
तसेच, नदीच्या काठावरील शाळा आणि आस्थापनांना तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावर अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत स्त्रोतांमधून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0 Comments