सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून बुधवारी दुपारपर्यंत नदीने तब्बल ३५.५ फूटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इशारा पातळी ४० फूटांवर असून धोका पातळी ४५ फूट आहे. त्यामुळे पुढील काही तास नदीच्या वाढत्या पातळीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पुरपरिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून बचाव व मदत पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी जाण्याचे टाळावे, सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सांगली : कृष्णा नदीने धोक्याची पातळी गाठण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल सुरू केली आहे. नदीकाठच्या पूर पट्ट्यातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी धाकधूक निर्माण झाली आहे. कर्नाळ रोडवरील पुलावर पाणी आले असून सूर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी घुसले आहे.
पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या असून पूर पट्ट्यातील शंभराहून अधिक कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आवश्यक तेवढ्याच हालचाली कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर मदत व बचाव पथके सतत गस्त घालत आहेत. नदीच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास स्थलांतरित कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 Comments