शासकीय आश्रम शाळा चणकापूर, ता. कळवण, जि. नाशिक येथे एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी कनाशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरही संबंधित विभागाने योग्य ती कार्यवाही न केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. प्रा. अशोक उईके या मंत्री महोदयांनी शाळेला भेट दिली असली तरी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून कोणतीही ठोस कार्यवाही न करता त्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. ठेकेदारांचे हित जपण्यासाठी निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पिडीत पालकांना केवळ आर्थिक मदतीच्या आमिषावर गप्प करण्याचा प्रयत्न होईल, असा आरोपही करण्यात आला आहे. एका मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून तो भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकला असता. चुकीच्या धोरणांमुळे एका जीवाची हत्या झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आरोग्य सेवेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेत नियुक्त नर्स असूनही एका विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यात अपयश आले. मग या नियुक्त्यांचा उपयोग काय? असा प्रश्न विचारला जात आहे. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार आणि दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करून आदिवासी समाजाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
या निष्पाप बालकाला श्रद्धांजली अर्पण करून "अंतिम जोहार" व्यक्त करण्यात आला.

0 Comments